बीड: भगवानगडावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरुन सुरु झालेलं महाभारत काही केल्या थांबायला तयार नाही. भगवानगडावर पंकजा मुंडेंची सभा होऊ द्यावी नाही तर मठाधिपती नामदेव शास्त्रींनी गादी सोडावी अशा सज्जड दम भगवानगड दसरा मेळावा कृती समितीनं दिला आहे.


औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला आहे. भगवान गडावर पंकजा मुंडेंचं किंवा कुठल्याही राजकीय भाषणाला मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी विरोध आहे. त्यानंतर आता भगवान गड परिसरातील शंभर ग्रामपंचायतीनं पंकजा मुंडेंच्या बाजूनं ठराव दिला आहे.

भगवानगड दसरा मेळावा कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीनं पंकजा मुंडेंना भगवानगडावरील दसरा मेळाव्यासाठी आमंत्रणही पाठवलं आहे. त्यामुळे येत्या काळात दसरा मेळाव्यावरुन महाभारत बघायला मिळू शकतं.