कोल्हापूर : गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उशिरा का होईना कोल्हापूरचं जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत असल्याने, ब्रिटिशकालिन शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार सुरु आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं आता धोक्याच्या पातळीकडं वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे काल सायंकाळी ७ वाजल्यापासून ऐतिहासिक ब्रिटिशकालीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगेने मच्छिन्द्री गाठली. यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी राज्य मार्ग बंद करण्यात आला आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळं पोलीस आणि वाहनचालकांच्यात वादावादीचे प्रकारही घडले आहेत.

मच्छिन्द्री होणे म्हणजे काय?

पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालिन शिवाजी पूलाची रचना कमानींच्या स्वरुपातली आहे. या प्रत्येक कमानीवर माशाचा आकार कोरण्यात आला आहे. या माशापर्यंत पाणीपातळी पोहोचल्यानंतर शहरवासियांना धोक्याची घंटा असल्याचं समजलं जातं. सध्या पंचगंगेच्या पाणीपातळीनं माशाला स्पर्श केल्यानं नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

कोल्हापुरात पंचगंगेची पातळी 41 फुटांवर, 150 गावांचा संपर्क तुटला


कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका