चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवून आणि प्रत्यक्ष दारूविक्री सुरु व्हायला आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झालेली दिसत आहे. विशेषतः खून, बलात्कार आणि कौटुंबिक कलह या सारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.


चंद्रपुरात दारू विक्रीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली आणि लोकांच्या दारू दुकानांवर झुंबड उडाल्या. गेल्या एका महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात मद्यप्रेमींनी तब्बल 12 लाख लिटर दारू रिचवली. या मुळे राज्यातील तिजोरीला नक्कीच फायदा झाला असेल मात्र यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिगडायला सुरुवात झाली आहे की काय अशी शंका यायला लागली आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरु होण्याआधीचा एक महिना आणि दारू सुरु झाल्यानंतरच्या एका महिन्याची गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर यात लाक्षणिक बदल दिसून आला आहे.



  • खून - जूनमध्ये 1 तर जुलैमध्ये 9 

  • जीवे मारण्याचा प्रयत्न -  जूनमध्ये 1 तर जुलैमध्ये 4

  • दरोडा - जून मध्ये 1 तर जुलैमध्ये 6

  • घरफोडी - जूनमध्ये 9 तर जुलैमध्ये 15

  • दंगा -  जूनमध्ये 5 तर जुलैमध्ये 13

  • बलात्कार  - जूनमध्ये 6 तर जुलैमध्ये 12

  • विनयभंग  -  जूनमध्ये 18 तर जुलैमध्ये 24

  • अपघात - जूनमध्ये 18 तर जुलैमध्ये 21
    तर दारूमुळे होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना जून मध्ये 26 तर जुलैमध्ये 36 नोंदविण्यात आल्या आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यावर गुन्ह्यांच्या प्रमाणात घसरण झाली होती. मात्र दुसरीकडे अवैध दारू विक्री, तस्करी आणि त्यात सामील झालेल्या लोकांमध्ये मोठी वाढ झाली हे देखील तितकंच खरं आहे. आता दारू सुरु झाल्यामुळे या गुन्हेगारीच्या या ग्राफने पुन्हा उचल खाल्ली आहे.


अवैध दारूविक्रीच्या धंद्यातून होणारा मोठा फायदा पाहून चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नवीन गुन्हेगार या कामात उतरले. ही संख्या शेकडोंच्या घरात आहे. दारू सुरु झाल्यामुळे दारूच्या अवैध व्यवसायात गुंतलेले लोक बेरोजगार होण्याची आणि गुन्हेगारी विश्वाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे.


संबंधित बातम्या :


दारूच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या वनिता राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचे केले स्वागत