सांगली: सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील सात तालुके भीषण दुष्काळाच्या छायेत आहेत. उभी पिके करपून गेली आहेत. तर अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने या भागात दुष्काळ परिस्तिथी निर्माण झाली आहे.  जिल्ह्यातील पाऊस, पेरणी आणि पीक पाहणी करुन खरीप हंगामाचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारकडे सादर केला असून, त्यात या तालुक्यातील 300 हून अधिक  गावांवर दुष्काळाचे सावट  ओढावल्याचे चित्र दिसत आहे.


जिल्ह्याच्या पूर्वभागात यंदा  परतीचा पाऊसही  पुरेसा न झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.  बहुसंख्य तलावही कोरडे पडले आहेत. अग्रणी नदीत देखील चार वर्षांपासून पाणी आलेलं नाही. मका, ज्वारी, ऊस, केळी अशी अनेक उभी पिके जाग्यावर करपून गेली आहेत.



यामुळे जिल्ह्यातील पूर्वीकडील तालुके भीषण दुष्काळाच्या छायेत सापडले आहेत. जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस, तासगाव या 7 तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

सहकार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दोनच दिवसांपूर्वी या तालुक्यांना भेटी देत दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली होती.  या भागातील शेतकऱ्यांना ठोस आश्वासन मिळाले नव्हते.  त्यामुळे या भीषण परिस्थितीवरती सरकार काय उपाययोजना करते याकडे या तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



जिल्ह्यातील या तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्यापार्श्‍वभूमीवर पाणी योजना पूर्ण क्षमतेने चालवण्यची मागणी जोर धरत आहे.  टेंभू, ताकारी, आरफळ या योजना सुरू झाल्या असल्या तरी खानापूर घाटमाथ्यावर पाचव्या टप्प्यातून पाणी मिळावे ही मागणी आता जोर धरु लागली आहे.