पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने दाखल केलेलं पहिलं आरोपपत्र आता या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींसाठी बचावाचा सर्वात मोठा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. कारण, नुकत्याच पकडलेल्या आरोपींमुळे नवा वाद समोर आला आहे.


सीबीआयने पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात 6-9-2016 ला वीरेंद्रसिंह तावडे याच्या विरुद्ध आरोपपपत्र दाखल केलं. ज्यामधे वीरेंद्रसिंह तावडे याला दाभोलकरांच्या हत्येमागील मुख्य सुत्रधार सांगण्यात आलं. या आरोपपत्रातच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी तावडेच्या सांगण्यावरुन दाभोलकरांची हत्या केल्याचं म्हटलंय.

त्यासाठी पुरावा म्हणून दोन प्रत्यक्षदर्शींनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची स्केचेसच्या आधारे ओळख पटवल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलं. त्याचबरोबर कधीकाळी वीरेंद्रसिंह तावडेचा सहकारी असलेल्या संजय साडवीलकर यांच्या जबाबाचा हवाला देण्यात आला. आता बचावपक्ष त्याचा स्वत:च्या बचावासाठी वापर करण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रातील दावे

सीबीआयने शिवाजीनगर न्यायालयात सादर केलेल्या पहिल्या आरोपपत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांचा मारेकरी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आरोपी मारेकऱ्यांची ओळख पटवलेले साक्षीदार असल्याचाही दावा सीबीआयने केला.

सध्याची अडचण काय?

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरे हाच दाभोलकर हत्या प्रकरणातील शूटर आहे, असं सीबीआयचं म्हणणं आहे. मात्र अगोदर सादर केलेल्या आरोपपत्राचा हवाला हा नव्याने अटक केलेल्या आरोपींसाठी बचावाचा सर्वात मोठा मार्ग ठरु शकतो, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या :

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं?

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र