AnnaBhau Sathe :  केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या महामानवांच्या यादीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब भाजपच्या अनुसूचीत जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या लक्षात आली. याबाबत भालेराव यांनी फाऊंडेशनला पत्र पाठवून त्यात सुधारणा करण्याची विनंती केली आहे. मात्र, अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध नाहीत, त्यामुळे ते महामानव ठरत नाहीत असा उल्लेख असलेले पत्र फाऊंडेशनने सुधाकर भालेराव यांना पाठवले आहे. तसेच फाऊंडेशनच्या नियमाप्रमाणे राज्यातून अशा पद्धतीचा प्रस्ताव यावा लागतो. तो प्रस्ताव फाउंडेशनच्या बैठकीत ठेवून त्यावरती मान्यता घ्यावी लागते. मगच महामानवाच्या यादीमध्ये एखाद्या व्यक्तीचा समावेश होतो अशी फाऊंडेशनची प्रक्रिया आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या महामानवांच्या यादीत समावेश करण्याची प्रक्रिया जरी असली तरी फाऊंडेशनने पाठवेले पत्र संतापजनक आहे. कारण त्यांनी पत्रात उघडपणे अण्णाभाऊ साठेंची अवहेलना केल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध नाहीत, त्यामुळे ते महामानव ठरत नाहीत असा उल्लेख केलेले पत्र माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पाठवले आहे. त्यामुळे आता नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 




डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पाठवलेले पत्र


 


डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या यादीत या संताचा समावेश 


फाऊंडेशनतर्फे अनुसूचित जातीसाठी कल्याणाच्या योजना राबवल्या जातात. तसेच समाजसुधारक, प्रबोधनकारांची जयंती साजरी करताना केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत केली जाते. या यादीमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत रविदास, संत कबीर या महापुरुषांसोबतच राज्यपातळीवरील छत्तीसगढचे संत व सतनामी समाजाचे गुरू बाबा घासीदास, केरळचे पुलियार समाजाचे गुरू संत अय्यंकली, तमिळनाडूचे गुरू नंदनार, महाराष्ट्रातील संत चोखामेळा, संत नामदेव यांचा समावेश आहे.





माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी लिहलेले पत्र


डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन अंतर्गत देशभरातील महापुरुष, समाजसुधारक यांच्या विचारांचा प्रसार व प्रचाराचे काम होते. तसेच राष्ट्रीय आणि राज्यातील समाजसुधारक, प्रबोधनकारांचा फाऊंडेशनच्या यादीत समावेश आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय फाऊंडेशनच्या या उत्तरामुळे संताप व्यक्त होत आहे. या सगळ्या प्रकरणावर सुधाकर भालेराव यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मधल्या काळात भाजप आणि आधीच्या शासनाने अशा पद्धतीचा प्रस्ताव न दिल्यामुळे हा अनुचित प्रकार घडला आहे. ही चर्चा होत असताना पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा याबद्दलची चर्चा देखील सुरू झाली आहे.



...तर केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही 


भारतातील प्रबोधनकरांच्या यादीतून दलित समाजात जन्माला आलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे नाव वगळने म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा अपमान करणे होय. कोणत्याही परिस्थितीत हे खपवून घेणार नाही असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी हजारो पोवाडे, शेकडो पुस्तके, शेकडो चित्रपटासाठी कहाण्या लिहल्या, त्यातून बहुजन समाजातील मुलांना आजही प्रेरणा मिळते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे नाव वगळू नये. आदराने अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकरांच्या यादीत सामील करावे, अन्यथा केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्र राज्यात फिरू दिले जाणार नाही अशा इशाराही सचिन खरात यांनी दिला आहे.