औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले आहेत, की ते वेडे झाले आहेत, असं धक्कादायक वक्तव्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. आपण अधिकृतपणे बोलत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना दिवाकर रावते यांनी हे अजब वक्तव्य केलं.


एसटी महामंडळ आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या वतीने औरंगाबादेत शहर बससेवा चालवली जाणार आहे.  सध्याच्या पगारातच शहर बससेवाही चालवली जाणार का, असा प्रश्न रावतेंना विचारण्यात आला. त्यावर- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले आहेत, की ते वेडे झाले आहेत. मी हे अधिकृतपणे बोलत आहे, असं उत्तर दिवाकर रावतेंनी दिल्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो.

एसटी आपला तोटा भरुन काढण्यासाठी माल वाहतूक सुरु करणार असल्याची माहितीही रावतेंनी दिली. एसटीच्या कायद्यात तशी तरतूद असल्याने लवकरच रेल्वे प्रमाणे एसटीतून मालवाहतूक सुरु होणार आहे.

वेतनवाढीच्या मागणीसाठी जून महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे सरकारचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. संपावेळी हिंसाचार करण्यात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या सर्व कर्मचाऱ्यांवर सरकारने बडतर्फीची कारवाई केली होती.