मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपयांची जमा झालेली रोकड ठेवायची कुठे, असा प्रश्न सहकारी बँकांना पडला आहे. आरबीआयकडून जुन्या नोटांबाबत कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचं म्हटलं जातं.


रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सहकारी बँकांनी हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारल्या, आणि त्याबदल्यात नव्या नोटाही दिल्या. मात्र जुन्या नोटा आरबीआयकडे पोहचवण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यासंदर्भातील कुठल्याच सूचना आरबीआयनं दिलेल्या नाहीत.

दुसरीकडे गेल्या तीन ते चार दिवसांपासून सहकारी बँकांना पैशांचा पुरवठाही तुटपुंज्या स्वरुपात होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सहकारी बँकांची कोंडी झाल्याचं चित्र आहे.

सहकारी बँकांवर लादलेले निर्बंध मागे घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारीच एल्गार पुकारण्यात आला होता. नागरी सहकारी बँकांबाबत निर्णय न घेतल्यास बँका बंद करु, असा इशारा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने दिला होता.

पाचशे हजारच्या नोटा बंद केल्यानंतर अशा नोटा स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने सहकारी बँकांवर घातले आहेत. त्यामुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प आहेत.