मुंबई :  सुशांतसिंह, दिशाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा नारायण राणेंनी यावेळी केला. तर अमित शाहांना फोन केल्यानंतर पोलिसांनी सोडलं असंही नारायण राणे यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुलगा नितेश राणे यांची मुंबईतील मालवणी पोलिसांकडून नऊ तास चौकशी करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशी सॅलियनच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 


नारायण राणे म्हणाले,  सुशांतची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. सुशांतच्या केसबद्दल आणि एका मंत्र्याची गाडी होती या बद्दल बोलू नका.  तुम्हालाही मुले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  ही सगळी  ही वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळली आहे.


दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची या वक्तव्याप्रकरणी त्यांची आज चौकशी करण्यात आली. यावेळी नारायण राणे यांच्या मते, पोलिसांना दर 10 मिनिटांना फोन येत होते. ज्यातून त्यांच्यावर वरच्या स्तरातून दबाव असल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळे माझ्याकडील पुरावे योग्यवेळी सीबीआयकडे देईन असं यावेळी राणे म्हणाले.


दिशाच्या पालकांची महिला आयोगाकडे धाव


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिशा सालियनच्या आई-वडीलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राणेंच्या आरोपांमुळे दिवगंत दिशाची नाहक बदनामी होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता. 


संबंधित बातम्या :