ठाणे : राज्यात लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काँग्रेस आणि महाआघाडीत समविचारी पक्षांना मोठ्या प्रमाणात सामावून सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमसोबतही चर्चा सुरु असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधीकाऱ्यांच्या मेळावा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्यावेळी ते बोलत होते.


मोदी सरकारने वारंवार पेट्रोलचे दरवाढ केल्याने अचानक 25 ते 30 रुपये पेट्रोल दरात वाढ करुन 5 रुपये कमी केले म्हणून जनतेवर उपकार केले नसल्याचा टोला पाटील यांनी मोदी सरकारला लगावला. आघाडीच्या काळातील दर आणि आताच्या सरकारातील दर याचं अवलोकन करावे म्हणजे समजेल असेही ते म्हणाले.

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य सरकार गहाण ठेवण्याची भाषा मुख्यमंत्री करत आहे. बाबासाहेबांची 5 स्मारके राज्यात होतील इतकी ताकद या महाराष्ट्रात आहे. जर बाबासाहेबांचे स्मारक व्हावे अशी सरकारची इच्छा असती तर चार वर्षात स्मारक का तयार झाले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुळात स्मारकाबाबत भाजपची इच्छाच नसून केवळ आगामी निवडणुकीसाठी याचा वापर मुख्यमंत्री करत आहेत अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली.

आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत त्यांना विचारताच सम विचारी पक्षांना आघाडीत सामावून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच जर कुणाला शिवसेना भाजपला अप्रत्यक्षपणे मतांचे विभाजन करण्याचे काम करायचे असेल तर महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे ते समोर येईलच.

समृद्धी महामार्गाच्या खर्चाबाबत झालेल्या हजारो कोटीच्या वाढीबाबत पाटील यांनी आगामी अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जर एका वर्षात एवढया प्रमाणात खर्चात वाढ होत असेल तर भाजप सरकार जनतेची लुटच करीत असस्ल्याची टीका त्यांनी केली.