Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याबाबत लवकरच फाईलवर सही करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी आणखी चार महिने शिल्लक आहेत. त्यापुढे आणखी दीड वर्ष एक्स्टेन्शन मिळण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.


 


मुख्यमंत्री सकारात्मक, लवकरच फाईलवर सही करणार 


जून 2024 मध्ये रश्मी शुक्ला निवृत्त होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत रश्मी शुक्लांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यांना पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.


 


फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत



फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख म्हणून रश्मी शुक्ला यांच्यावर होती, त्यामुळं त्यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.


 


फोन टॅपिंग प्रकरण काय आहे?


2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर ठेवण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आलेला होता. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाना पटोले यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री रावसाहेब दानवेंचे स्वीय सहाय्यक आणि तत्कालीन भाजपचे खासदार संजय काकडे, इतर लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवाल देखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.


 


 


महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक


जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. 


 


हेही वाचा>>>


Maharashtra Politics : शिवसेनेच्या पक्ष निधीवरून पुन्हा एकदा राजकारण, प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार!