बीड: जगमित्र साखर कारखान्याच्या जमिनीवरुन शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिलेल्या पत्राला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं.


महामार्ग आणि शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला, म्हणूनच मुंजा गित्ते प्रकरणावरुन आपल्या बदनामीचे षडयंत्र सुरु आहे, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाला जाहीर आव्हान दिलं होतं. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली होती.

त्यावर मुंजा गित्ते यांनी आक्षेप घेत धनंजय मुंडे यांना पत्र लिहिलं होतं.

परळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही, असं जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिलं होतं.

धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

मुंजा गित्ते प्रकरणावर धनंजय मुंडेंनी आज बीडमध्ये स्पष्टीकरण दिलं.

“ज्या मुंजा गित्तेंची जमीन जगमित्र कारखान्यासाठी घेण्यात आली होती, त्या जमिनीचा संपूर्ण मोबदला त्यांना दिला आहे. त्याचे सर्व रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध आहे. हवे असेल तर त्यांना आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांनाही त्यांची जमीन परत देण्याची तयारी आहे”, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.

असे असूनही मागील चार वर्षांपासून सातत्याने मुंजा गित्ते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे काही नेते आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

सरकारने मागील आठवड्यात घेतलेल्या एका भूसंपादना संबंधीच्या निर्णयाला मी कडाडून विरोध केल्यामुळे पुन्हा एकदा आपली बदनामी करण्यासाठी श्री मुंजा गीते यांचा वापर केला जात आहे, असं मुंडे म्हणाले.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याच्या जमिनीचे मूल्य आणि महत्व मला चांगलेच माहित आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या बांधवांची जमीन मी कदापिही घेणार नाही.  गीते यांनाच नव्हे तर या प्रकल्पासाठी ज्यांनी ज्यांनी जमिनी दिल्या आहेत, त्या सर्वांना त्यांची इच्छा असेल तर खरेदी केलेल्या भावात किंवा आजच्या भावात त्या जमिनी परत करण्याचीही आपली तयारी आहे, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

कारखाना सुरु झाला नसल्यामुळे त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रकल्प सुरू झाला असता, तर त्यांना नक्कीच नोकरी दिली असती. त्यांच्याकडे तो चेक कसा गेला याबाबत न्यायालयीन कारवाई सुरू असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातमी

प्राण देण्यापेक्षा आमच्या जमिनी द्या, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेंना पत्र