बीड : कर्जमाफी संदर्भात केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे, तर योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन त्यांच्या नावाचाही अपमान केला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.


बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने टीका मोर्चाचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने धनंजय मुंडे यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं.

पंकजा मुंडेंना टोला

जिल्ह्यामध्ये इतके प्रश्न असताना आमच्या पालकमंत्र्यांना मात्र फक्त वीस मिनिटं पाहिजे आहेत, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री आणि त्यांच्या चुलत बहिण पंकजा मुंडेंना टोला लगावला.

''ऊसतोड कामगार महामंडळाची अजून स्थापना नाही''

सरकारने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ बनवण्याची घोषणा केली. परळीमध्ये या महामंडळाचं ऑफिस करणार असल्याचं सांगितलं. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मलाही ऑफिस सापडलं नाही, असं म्हणत धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा साधला.

बीडचा मोर्चा हा केवळ सरकारला इशारा आहे. एक महिन्याच्या आत कर्जमाफीचा लाभ आणि मराठवाड्यातल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.

जिल्हा बँक बुडवणारे मोर्चा काढतायेत - सुरेश धस

राष्ट्रवादीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चावर माजी मंत्री सुरेश धस यांनी खरमरीत टीका केली. जिल्ह्यात खरी राष्ट्रवादी राहिलीच नसून जिल्हा बँक बुडवणारेच मोर्चा काढत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यवस्थित माहिती घेऊन मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला सुरेश धस यांनी दिला.