अमरावती : या राज्याच्या शेवटच्या माणसाच्या प्रश्नासाठी, जे जे संकटं येतील त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.


अमरावतीत शरद पवारांचा सर्वपक्षीय जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर आयोजित सत्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

''अमरावतीशी माझा जुना संबंध''

अमरावतीशी असलेल्या आठवणींना शरद पवारांनी यावेळी उजाळा दिला. जेव्हा कापसाच्या वाणाला भाव मिळावा म्हणून मी दिंडी काढली, तेव्हा त्या दिंडीत सगळ्यात जास्त लोक अमरावतीतून सहभागी झाले होते. महिलांनी गाड्या भरून भाकरी पाठवल्या होत्या. त्यामुळे अमरावतीशी जुना संबंध आहे, असं शरद पवार म्हणाले.

''कर्जमाफी हा शेवटचा उपाय नाही''

कर्जमाफी एखाद वेळी करावी लागते. पण कर्जमाफी कायमचा उपाय नाही. उत्पादन खर्चाचा विचार करुन अधिक 50 टक्क्यांनी त्याला किंमत देणं हा उपाय आहे. शेतकऱ्याची ताकद वाढवायची, सांपत्तिक स्थिती वाढवायची, त्यानंतर शेतकरी कधीही कर्ज माफ करा म्हणणार नाही. शेतकरी हा एकच वर्ग असा आहे, ज्याला घेतलेला पैसा परत केल्याशिवाय चैन पडत नाही, असं शरद पवार म्हणाले.

''नवीन वाणाला विरोध करु नये''

दरम्यान कापसाचं उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचं मतही शरद पवारांनी व्यक्त केलं. चुकीची औषधं येत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र नवीन वाणाला विरोध करु नये. कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं पवारांनी सांगितलं.

संबंधित बातमी : राज्याच्या हितासाठी पवारांनी मताचा विचार कधीच केला नाही : मुख्यमंत्री


VIDEO : शरद पवार यांचं संपूर्ण भाषण