बीड : राष्ट्रवादीला गळती लागली आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र हा राजकीय भ्रष्टाचार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर तो सत्तेचा गैरवापर आहे, असे टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले.


यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, भाजपचे शतप्रतिशत यश हेच आहे का?  दुसऱ्या पक्ष्याचे आमदार किंवा इतर पदाधिकारी फोडणे याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी स्वतःला जे शत प्रतिशत समजते हे साफ खोटे आहे, असं मुंडे म्हणाले.

2014 च्या निवडणुकीआधीही निवडून आलेले अनेक आमदार पक्ष सोडून गेलेले आहेत आणि ते गेल्याने राष्ट्रवादी पक्ष संपणार नाही, असे मुंडे म्हणाले.

कुणी कुठल्या कारणाने आमच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकला हे येणाऱ्या काळात उघडकीस येईल. शिवसेना-भाजप ने जे काही आमिष दाखवून जे काही केलं त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. या बरोबरच राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. महाराष्ट्रात हा पक्ष जमिनीवर पाय जखडून आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.



आजपर्यंत असं राजकारण कुठल्याही राजकीय पक्षाने केले नव्हते. ते राजकारण आज भाजप-शिवसेना करत आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही, असेही मुंडे म्हणाले.

भाजपा-सेनेच्या कारकिर्दीत अनेक गंभीर भ्रष्ट्राचाराची प्रकरणे घडली आहेत. आघाडी सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्हाला सत्तेचा गैरवापर करण्याचीही गरज राहणार नाही. परिस्थिती अशी होईल की त्या भ्रष्ट नेत्यांना एक दिवसही स्व:पक्षात राहणे अवघड होऊन जाईल, असे मुंडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजपा-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. सरकार येत असतात, जात असतात... बाजी पलटने में देर नहीं लगती, असेही त्यांनी म्हटले आहे.


संबंधित बातम्या