अमरावती : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सटता सुटत नाहीये. त्यात मात्र कितीही हालचाली झाल्या तरी आज रात्रीपर्यंत राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल आणि ते देवेंद्र फडणवीसच असतील, असा विश्वास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल असाही दावा त्यांनी केला. विकासाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. आज सायंकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल असंही त्या म्हणाल्या.


थोडी वेळ इकडे तिकडे होईल मात्र मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस हेच बसतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आज संध्याकाळपर्यंत काहीही होवो मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. पोरं ही पोरंच असतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना आणि राष्ट्र्वादी-काँग्रेसचे सरकार येणार कशी? त्यांना एक दिवसाचा वेळ दिला आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल ते त्यांनी  करावं, मात्र असं होणार नाही. संध्याकाळपर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होईल.

भाजपचा मुख्यमंत्री होणे ही जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. कारण केंद्रात आमची सत्ता आहे जर राज्यात आमची सत्ता असेल तर जनतेची कामं होतील. दोन्हीकडून बरोबरीचे सहकार्य मिळाले तर विकास होईल, म्हणून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी बसले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.



मोठ्या नेत्यांनी त्यांच्या सत्तास्थापनेसाठी विचार करावा आंम्ही आमच्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करत राहू, असेही खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

नवनीत राणा ह्या अमरावती लोकसभेच्या खासदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर त्या खासदार झाल्या. मात्र त्यांनी नंतर भाजपला समर्थन दिले.  त्यांचे पती रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून आमदार आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.