मुंबई : मुंबईत साल 2013 मध्ये घडलेल्या प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी अंकुर पनवार याला मुंबई सत्र न्यायालयानं सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. शिवाय त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर युक्तिवादास हायकोर्टात सोमवारपासून सुरुवात झाली आहे.


अॅसिड हल्ल्याप्रकरणी एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सूनावण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे.

नौदलाच्या रुग्णालयात नोकरीकरिता रुजू होण्यासाठी हरयाणाची प्रीती राठी दिल्लीहून 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. गरीबरथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती आपल्या कुटुंबियासमवेत उतरत असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अंकुर पनवारनं तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले होते.

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही प्रीतीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले होते. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अंकुर पनवारला सप्टेंबर 2016 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

सोमवारच्या सुनावणीत या शिक्षेला विरोध करताना केवळ कुटुंबियांच्या सांगण्यावरून अंकुर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अॅसिड भरलेल्या बाटलीवरही त्याच्या हाताचे ठसे पोलिसांना आढळून आलेले नाहीत. असा युक्तिवाद बचाव पक्षाच्यावतीनं करण्यात आला. हायकोर्टानं हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे.