बीड : बीड जिल्ह्याच्या परळी येथील अपहरण झालेल्या अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यात यश मिळालं आहे. आज पूर्णा पोलिसांच्या पथकाकडून मयत तरुणाचे पुरलेले प्रेत तब्बल 40 दिवसांनंतर बाहेर काढण्यात आले आहे.


परळी येथील अजय भोसले ह्याने पळून जाऊन एका मुलीसोबत लग्न केले होते. अजयचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने 3 मार्च रोजी परळी पोलीस ठाण्यात केली होती. अपहरण हे पूर्णा येथून झाले असल्याने हे प्रकरण पूर्णा पोलिसांना वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणी पूर्णा पोलिसात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्यानुसार पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी तपास चक्र फिरवून परळी रेल्वे स्थानक परिसरातून अपहरणाच्या गुन्ह्यात शक्तीसिंग बावरी आणि बचन सिंग बावरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडीदरम्यान चौकशी करण्यात आल्यांनतर या अपहरण प्रकरणास वेगळेच वळण लागले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अजयची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानुसार आरोपींनी अजय भोसलेचा मृतदेह परळी येथेच पुरून ठेवला असल्याचे सांगितल्याने आज पुर्णा पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणाहून मृतदेह बाहेर काढला आहे. मृतदेहाची शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणी करण्यात आली असल्याची माहिती तपसाधिकारी फौजदार चंद्रकांत राठोड यांनी दिली.

प्रेम प्रकरणातून खून
परळी येथील मयत अजयचे याचे आरोपीच्या बहिणीवर प्रेम होते. दसऱ्यादरम्यान हे दोघे घरून पळून गेले होते. मुलीच्या आईने या अल्पवयीन जोडप्याला विश्वासात घेत लग्न लावून देतोत म्हणून 18 फेब्रुवारी रोजी पूर्णा येथे बोलावून घेतले. त्यांना एका स्कॉर्पियो गाडीने परळी येथे नेण्यात आले. 3 मार्च रोजी अजयच्या आईने आपल्या मुलाचे पूर्णा येथून अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी 18 मार्च रोजी आरोपी शक्तीसिंग बावरी आणि बचन सिंग बावरी याना अटक करण्यात आलं होतं. तपासादरम्यान त्यांनीच हत्या केल्याचं कबुल केलं. या प्रकरणातील दुसरीकडी असलेली मुलगी ही कुठे आहे याबाबत अजून कसलीही माहिती हाती लागली नाही. तर अजूनही चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.