Ajit Pawar on MVA Govt :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. रोज कोण कोण बोलतात सरकार जाणार. सरकार जाणार म्हणणारे देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण सरकारचे दुसरीकडे काम सुरू असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने, शरद पवार यांच्या मार्गदर्शनात सरकार पुढे जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्ष काम करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.


नाशिक येथील कळवण तालुक्यातील नाकोडे गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी कोरोना, नाशिकमधील विकास कामांवर भाष्य केले. सप्तश्रृंगी गडावर विकासासाठी 22 कोटी 50 लाखाचा आराखडा मंजूर आहे. विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. इतर जिल्ह्यात रस्त्याच्या कामात जास्त निधी दिला जातो, नाशिकवर अन्याय होतो अशी खंत आमदारांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.


कोरोनाचा नवा प्रकार, काळजी घ्या 


सर्वांनाी लस घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. एक नवीन विषाणू जगात पसरत आहे. अधिक वेगाने हा विषाणू पसरत आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मी काल पुण्यात याबाबत आढावा घेतला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे आढावा घेत आहेत. आरोग्य खात्याला साडेसात हजार कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती पवार यांनी दिली. दुबईतून दाम्पत्य पुण्यात आले. त्यातून चालकाला कोरोना झाला. त्यानंतर कोरोना सर्वत्र पसरला होता, अशी आठवण सांगताना त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. 


शरद पवारांसोबत तुलना 


शरद पवार यांनी बारामतीमध्ये विकास कामे केले आहेत. आता मी कामे करत आहेत. जेव्हा मोठे नेते काम करतात. त्यांच्यानंतर येणाऱ्यांसोबत त्यांची तुलना होते असेही अजित पवार यांनी म्हटले.