मुंबई: भारताला १९५२ साली पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोतर 'पद्म' पुरस्कार देण्याबाब, "भारतीय कुस्ती महासंघा'चे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांना शिर्डीत हे निवेदन देण्यात आलं. कुस्ती मल्लविद्या महासंघ, राहता तालुका कुस्तीगीर संघ आणि पैलवान फाऊंडेशन यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं.


देशात भाजपचं सरकार पुन्हा आलं, तर आपण खाशाबांना मरणोत्तर 'पद्म' पुरस्कार मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्र्वासन ब्रिजभूषण यांनी गेल्या वर्षी पुण्यात 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत दिलं होतं. पुण्यात झालेल्या पहिल्या पारंपरिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या वेळी ब्रिजभूषण यांनी 'एबीपी माझा'ला खास मुलाखत दिली होती. गणेश मानुगडे, ज्ञानेश्वर मांगडे, रवींद्र वाघ, शिवाजीराजे चौधरी या पैलवानांनी ब्रिजभूषण यांना विनयानं त्या मुलाखतीची आठवण करून दिली.

खाशाबा जाधव यांचा अपवाद वगळला तर भारताला आजवर ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा केंद्र सरकारच्या वतीनं 'पद्म' पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळं खाशाबांना मरणोत्तर 'पद्म' पुरस्कार देऊन त्यांनी गाजवलेल्या कामगिरीचा उचित सन्मान व्हावा, ही महाराष्ट्रातील कुस्तीरसिकांची मागणी 'एबीपी माझा'नंही सातत्यानं लावून धरली  आहे.