नागपूर : मुंबईत संयुक्त पत्रकाद्वारे युतीची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती प्रचंड मोठा यश मिळवेल असा दावा केला आहे. नागपुरात काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांच्या भाजपप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकार  नेहमीच विचारतात की युती किती जागा जिंकणार. मात्र, मी कधीच आकडा सांगत नाही. मात्र यावेळेला न भूतो, न भविष्यती एवढा मोठा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीला मिळेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. असा विजय आजवर कुठल्या ही पक्षाने किंवा युती ने मिळवला नसेल एवढा मोठा विजय आम्ही या निवडणुकीत मिळवू असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांनी आज  भाजपमध्ये प्रवेश केला. गोपाल अग्रवाल यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संदर्भात एक मोठा गौप्य स्फोट केला. मुख्यमंत्री म्हणाले की 2014 मध्ये जेव्हा भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या आणि बहुमताचा आकडा काहीअंशी लांब राहिला होता. तेव्हा भाजप बहुमताची व्यवस्था करत असताना सर्वात आधी  आमदार  गोपाल अग्रवाल यांनी संपर्क साधला.

गरज भासल्यास काँग्रेसकडून आमदारकीचा राजीनामा देण्याची आणि पुन्हा भाजपकडून निवडून येऊन बहुमतापर्यंत जाण्यास मदत करण्याची ऑफर दिली होती. तेव्हा आपण त्यांना काँग्रेसमध्येच थांबण्याची सूचना केली होती. त्यामुळे जरी ते शरीराने काँग्रेस मध्ये होते. तरी मनाने ते आमच्या सोबतच होते असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळेच जेव्हा विरोधी पक्षाच्या आमदाराला अत्यंत महत्वाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष करण्याची वेळ आली. तेव्हा आम्ही  चतुराईने  गोपाल अग्रवाल यांनाच लोकलेखा समितीचे अध्यक्ष केले असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला.

गोपाळ अग्रवाल यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष असताना सर्वात जास्त बैठका घेत आणि सर्वात जास्त अहवाल सादर करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचा दावा फडणवीस यांनी केला. भाजपमध्ये प्रवेश करताना गोपाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती करत ते पक्षीय राजकारणाच्या वर उठून मदत  करणार नेतृत्व असल्याचे मत व्यक्त केले. भाजप मध्ये विकास कामासाठी आलो आहे. मला कुठल्याही इतर लाभाची अपेक्षा नाही असेही ते म्हणाले.