मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी मे महिन्यात आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी निलंबित करण्यात आलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. येत्या 30 सप्टेंबरला त्यांचा निलंबन कालावधी संपणार होता.


श्रीनिवास रेड्डी यांचं निलंबन कालावधी संपण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य वनसेवेतील काही अधिकाऱ्यांनी त्यांचे निलंबन रद्द करण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. तर निलंबन रद्द व्हावं यासाठी रेड्डी यांच्या मंत्रालयातील चकरा वाढल्या होत्या. त्यांचा निलंबन कालावधी न वाढविल्यास त्यांना पदस्थापना मिळेल आणि हे प्रकरण गुंडाळले जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.


आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे एक चार पानी पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले होते. याच पत्राच्या आधारे काही दिवसांपूर्वी अमरावती पोलिसांनी कारवाई करत रेड्डी यांना ताब्यात घेत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. नंतर त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. 


आत्महत्येस विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी कारणीभूत
आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी वेगवेगळ्या तीन प्रकारच्या सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. यात चार पानी नोटमध्ये विनोद शिवकुमार हाच आत्महत्येस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. एम.एस.रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याचे कारनामे वेळीच रोखले असते, तर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवला नसता, ही बाब दीपाली यांनी स्पष्ट केली.


मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो संवाद झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली होती. दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये, माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं होतं.


उपवनसंराक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या तक्रार अर्जात म्हटलं होतं. हा तक्रार अर्ज रेड्डी, अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला होता. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा खुलासा केला होता. 


संबंधित बातम्या :