अमरावती : बहुचर्चित मेळघाटच्या वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावती पोलिसांनी रात्री उशिरा नागपूरात कारवाई केली. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केली असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी लावली होती. चौकशी झाल्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगीतल होतं. अखेर रात्री उशिरा श्रीनिवास रेड्डी यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. 


एम.एस. रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रसंचालक आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर रेड्डी यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन करण्यात आलं होतं. अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. 


वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्यावर सर्वात आधी बदलीची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या बदलीच्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. रेड्डी यांचे निलंबन न करता केवळ बदली का करण्यात आली, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात होता. याआधी या प्रकरणातील प्रमुख आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली होती. अशीच कारवाई एम.एस. रेड्डी यांच्यावरही करावी, यासाठी अमरावतीत आंदोलनं करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 


मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो संवाद झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली होती. दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये, माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं होतं.


उपवनसंराक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापुर्वी केलेल्या तक्रार अर्जात म्हटलं होतं. हा तक्रार अर्ज रेड्डी, अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला होता. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा खुलासा केला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :