साताऱ्यातील विरळीमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2017 07:57 AM (IST)
सातारा : माण तालुक्यातील विरळीमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याला वाचवण्यासाठी आपत्कालिन विभागाचे जवान आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण यात त्यांना यश आलं नाही साताऱ्याच्या माण तालुक्यामधील विरळी गावातील महिला दुपारी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन शेळ्या राखण्यासाठी माळरानावर गेली होती. खेळता-खेळता हा मुलगा उघड्यावर असलेल्या बोरवेलमध्ये पडला. आईसमोरच घडलेल्या घटनेमुळे तिनं मोठ्यानं मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरडा केली. त्यामुळे गावातील लोक घटनास्थळी धावत आले. यानंतर स्थानिक नागरिकांनी मुलाला वाचविण्यासाठी आपत्कालिन विभागाला याची माहिती दिली. संध्याकाळी उशिरा आपत्कालिन विभागाचे जवान आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मंगेश दुपारी बोअरवेलमध्ये पडला, त्यावेळी तो 10 फुटांवर अडकल्याचा जवानांचा अंदाज होता. मात्र जेसीबीनं खोदकाम सुरु केल्यावर त्याच्या हादऱ्यानं मंगेश 17 फुटावर गेला. तरीही त्याला वाचवण्यासाठी आपत्कालिन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण रात्री 2 वाजता मंगेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.