रायगड : निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून आठवडा उलटून गेलाय. मात्र हे वादळ आपल्या छातीवर झेललेल्या रायगड जिल्ह्याची अवस्था फार बिकट आहे. रायगडमधील मुरूड तालुक्यात या चक्रीवादळानं जमिनीवर प्रवेश केला. त्यामुळे या जिल्ह्याला या वादळाचा सर्वात मोठा तडाखा बसलाय. केवळ तालुक्याच्या ठिकाणी 10 कोटींहून अधिक मालमत्तेच नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उन्मळून पडलेले वृक्ष, कोसळलेले विजेचे खांब, उध्वस्त झालेल्या नारळी पोफळीच्या बागा, आंब्याची झाडं, शेकडो वर्षांपासून उभी असलेले वड आणि पिंपळाचे डेरोदार वृक्षही या वादळानं उखडून काढले. धोक्याची सूचना मिळताच मच्छिमारांनी गावानजीकच्या बंदरावर आणून ठेवलेल्या बोटी एकमेकांवर आदळून त्यांचंही मोठ नुकसान झालं आहे.


मुरूडची शान असलेल्या काशिद बिचवर तर नावालाही काही उरलेलं नाही. या बीचवरील एकही स्टॉल या वादळानं शिल्लक ठेवलेला नाही. इथल्या सुरूच्या बनात एकूण 47 फूड स्टॉल्स आहेत. मात्र झाडं कोसळल्यानं इथंला एकही स्टॉल टिकला नाही. एरवी शनिवार-रविवारी वन डे पिकनिकसाठी येणाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे इथं गाडी पार्क करायला जागा मिळणं मुश्किल असतं. मात्र सध्या या बीचची अवस्था अतिशय भयानक झाली आहे. याच पट्यात 1952 साली कोर्लाई गावात किल्ल्याच्या पायथ्याशी एक लाईट हाऊस उभारण्यात आलं आहे. चक्रीवादळात लाईट हाऊसचं नुकसान झालं नसलं तरी इथंवर येणाऱ्या अरूंद रस्त्यावरचे सारे विजेचे खांब पडले आहेत. हाय टेंशन वायर रस्त्यावर आल्या आहेत. तर लाईट हाऊसला विजेचा पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मरही कोसळा आहे. निसर्ग या चक्रीवादळात मुरूडमधील पेशवेकालीन भोगेश्वर मंदिराचंही बरंच नुकसान झालंय. या मंदिराची कौलं उडालीत, मंदिरासमोरचं शेकडो वर्षांपर्वीचं पिंपळाचं डेरेदार वृक्ष कोसळल्यानं मंदिर परिसराचं मोठ नुकसान झालंय. पेशवेकालीन मंदिर असल्यानं त्याला हेरिटेज दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे या मंदिराचा अद्याप जिर्णोद्धार झालेला नाही.


निसर्ग चक्रीवादळात मुरूड ते अलिबाग किनारपट्टीवरील मच्छिमारांचंही मोठं नुकसान झालंय. धोक्याची सूचना मिळताच आसपासच्या गावातील सर्व मच्छिमारांच्या बोटी गावांजवळील बंदावर आणून उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र वादळाच्या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, रांगेत लावलेल्या बोटी एकमेकांवर आदळून त्यांचं मोठ नकसान झालंय. आपल्या आजवरच्या हयातीत इतकं भयानक वादळ पाहिलं नसल्याचं इथले वयोवृद्ध मच्छिमार सांगत आहेत. विजयनगर मच्छिमार सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत यांनी या वादळाचा एबीपी माझाकडे कथन केलेला अनुभव अगदी बोलका आहे.


पाहा व्हिडीओ : Nisarga चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या नियमापेक्षा जास्त मदत करणार : विजय वडेट्टीवार



मरूड ते अलिबाग पट्यात ठिकठीकाणी महावितरणचे कर्मचारी खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मेहनत घेताना दिसतायत. सध्या ट्रान्सफॉर्मर ते ट्रान्सफॉर्मर कनेक्शन देण्याचं काम सुरु आहे. मात्र रस्त्यांलगत जे हाय टेन्शन वायरचे पोल निखळून पडलेत ते काम मात्र कंत्राटदारांमार्फत होणार असल्यानं ते कधीपर्यंत पूर्ण होईल हे माहिती नसल्याचं उत्तर इथं काम पाहणारे महावितरणचे अभियंता संतोष कोळेकर यांनी दिली. चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक घरांचं नुकसान झालं आहे. छतावरचे पत्रे फुटलेत. मात्र ते बदलण्यासाठी नवे पत्रेच बाजारात उपलब्ध नाहीत. जर उपलब्ध झालेच तर दुकानदार ते अव्वाच्या सव्वा किमतीत विकत असल्यानं ते सर्व सामान्यांना परवडणारे नाहीत. या चक्रीवादळात या भागातील पोफळीच्या आणि माडांच्या बागांचंही अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे बागायतदार हलावदिल झालेत. यातलं एक झाड पिक घेण्याइतपत मोठ होण्यासाठी किमान 15 वर्षांचा कालावधी लगतो. माडीचा व्यवसाय करणाऱ्यांचीही तिच अवस्था, त्यामुळे या वादळात झालेलं नुकसान भरून निघण्यासाठी त्यांना शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर या परिसरात लाईटचे जे पोल पडले आहेत. त्यांची वर्षानुवर्ष केवळ डागडुजी करण्यात आलीय. जर वेळीच ते बदलले असते तर आज वीज पुरवठ्याच्या बाबतीत इतकी भयानक परिस्थिती ओढावली नसती. असाही आरोप स्थानिकांकडून केला जातोय.


निसर्ग या चक्रीवादळामुळे मुरूडमध्ये जे नुकसान झालंय त्याचा सर्व्हे करण्याचं काम अद्याप सुरु आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 10 कोटींहून अधिकचं नुकसान हे केवळ मुरूड तालुक्याचं झालं आहे. संपूर्ण ग्रामीण भागाची आकडेवारी अजून बरीच मोठी आहे. अशी माहिती मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी एबीपी माझाला दिली. घराच्या पत्र्यांचा सध्या काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लोकांचं झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करण्याचं काम सुरु आहेत. लोकांनीही पुढाकार घेऊन प्रशासनाला मदत करण्याचं आवाहन नगराध्यक्षांच्या मार्फत करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


शरद पवार यांचा कोकण दौरा, आज रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी


रत्नागिरीला 75 कोटी, सिंधुदुर्गास 25 कोटींची तातडीची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा


....आणि चक्रीवादळातही 'ती' आनंदाने भारावून गेली!