सावित्री नदीत मगरींचा वावर, मृतदेह शोधण्यात अडथळे
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 10:23 AM (IST)
महाड (रायगड) : ज्या सावित्रीच्या पात्रात महाडची दुर्घटना घडली, तिच्यात शेकडो मगरींचा वावर असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. महाड दुर्घटना झाल्यानंतर मदतीला जाणाऱ्या स्थानिकांमध्येही मगरींची भीती असल्याचं दिसून येत आहे. महाबळेश्वरमध्ये उगम पावलेली सावित्री थेट श्रीवर्धनमध्ये अरबी समुद्राला मिळते. त्यातील महाडच्या विसावा हॉटेलपासून गांधारी नदीपर्यंत मोठ्या प्रमाणात मगरी दिसतात. गेल्या 20 वर्षात मगरींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हा परिसर 'मगर प्रवण क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता या मगरींमुळे महाड दुर्घटनेतील इतर मृतदेह मिळण्यात अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. महाड दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह हाती आलेले आहेत.