Coronavirus Updates : मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता, त्याच्या परिणाम राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे समोर येत आहे. राज्यात सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. हीच मागणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत  दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टनची आवश्यकता होती. ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी राज्यात पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पहिल्या लाटेत दिवसाला 850 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची मागणी होती, दुसऱ्या लाटेतही ऑक्सिजनची मागणी वाढली होती. कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणारे प्लांटही उभारण्यात आले, त्यामुळे राज्याकडे पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. 


राज्यात कोरोनाची लाट पुन्हा एकदा धडकणार असल्याचे चित्र असताना दुसरीकडे ऑक्सिजनची मागणी वाढणार असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. राज्याला सध्या 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज सध्या लागत आहे. कोरोनाबाधितांवरील उपचाराशिवाय इतर रुग्णांसाठी साधारणपणे किमान 200 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागते. ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा झालेल्या रुग्णांपैकी फार कमी जणांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र, वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यात आले असून गरज भासल्यास तातडीने वाहतूक करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


राज्यात शुक्रवारी तब्बल  40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात शुक्रवारी एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.  शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971  रुग्णांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून हजारांच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या शुक्रवारी फक्त 790 ने वाढली होती. त्यामुळे बाधितांच्या संख्या वाढ स्थिरावल्याचे समोर आलं आहे.