Banana Rate Issue in Nandurbar : कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाच्या दुष्टचक्रात अडककेल्या केळी उत्पादक (Banana Farmers)शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा सुलतानी फटका बसत आहे. केळीला मागणी नसल्याचे सांगत व्यापारी केळी तोडणीला येत नसल्याने केळीचे घड झाडावरच पिकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


केळी फक्त तीन रुपये प्रति किलो तरीही...
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली गेली. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून केळीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात केळी तीन रुपये प्रति किलोने परवडत नसतानाही शेतकरी केळी व्यापाऱ्यांना देण्यास तयार आहेत.मात्र केळी काढण्यास तयार नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला समोर जावे लागत आहे. 


गेल्या चार पाच दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे केळी पिकण्याचे प्रमाण वाढले आहे.पिकलेले केळीचे घळ शेतकरी काढून फेकत आहेत. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकत आहे.


लागवडीपासून एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च


केळी लागवडीपासून एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ऐन काढणीच्या वेळी व्यापारी मनमानी करत असतात. त्यात व्यापारी येत नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत असल्याने प्रशासनाने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेत मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


अस्मानी संकटाशी सामना करत रक्ताचे पाणी करून तयार झालेल्या केळीच्या खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने सोन्यासारखे पीक मातीमोल होत असल्याचे चित्र आहे. आता तरी शेतकऱ्यांच्या केळी खरेदीसाठी मायबाप सरकारने भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha