रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. त्यानंतर देखील कार किंवा बाईकनं रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय अशीच आहे. प्रशासन, सरकार यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्यानंतर समाजातील मोठा वर्ग या साऱ्या बाबींवर नाराजी व्यक्त करत आहे. वारंवार आवाहन करून, पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर देखील रस्त्यावर धावणाऱ्या कार आणि बाईकची संख्या अपेक्षित अशी कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत एक मोठा आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात बाईकला बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर बाईक दिसल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र मुभा देण्यात आली आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखावे आणि सहकार्य करावे असं आवाहन यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, यापूर्वीच रत्नागिरीतील पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना केवळ पेट्रोर किंवा डिझेल दिले जात होते. शिवाय, महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना आता ऑनलाईन पद्धतीनं पासेस दिले जाणार आहे. नागरिकांचे कारण पडताळल्यानंतर त्यांना हे पास दिले जातील.

कैदी सुटणार पॅरोलवर

कोरोनाचं संकट लक्षात घेता आता 19 कैद्यांना 45 दिवसांकरता पॅरोलवर सोडले जाणार आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार ही निर्णय झाल्याची माहिती यावेळी मुंढे यांनी दिली.

सध्या काय आहे रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण

एकंदरीत साऱ्या परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर, नाक्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. ग्रामीण भागात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गावांच्या वेशी देखील बंद केल्याचं दिसून येत आहे. त्याठिकाणी असलेले नागरिक हे बाहेरून येणाऱ्या किंवा गावाबाहेर जाणाऱ्या व्यक्तिकडे विचारपूस करत त्याला आत किंवा गावाबाहेर जाण्याची परवानगी देत आहेत. या साऱ्या स्थितीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत होईल याकरता जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पोलीस, आरोग्य यंत्रणा यांच्याकडून देखील साऱ्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

चाकरमाणी गावाकडे

कोकणातील मोठा वर्ग सध्या मुंबईमध्ये कामानिमित्त स्थायिक झाला आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांचे देखील गावी येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही चाकरमानी हे स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घेत गावचा रस्ता धरत आहेत. तर अनेकांनी समुद्रीमार्गे गावी येणे पसंत केले आहे. पण, त्यावर देखील पोलिसांची करडी नजर आहे. गावी येण्यास विरोध नसून सध्याची परिस्थिती ओळखून ही पावलं उचलली गेल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितले आहे.