मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला आहे. अशातच राज्यात आज दिवसभरात 15 हजार 602 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आज दिवसभरात 7 हजार 467 कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 21 लाख 25 हजार 211 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात एकूण 11 लाख 8 हजार 525 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.49 टक्क्यांवर पोहोचले आहे.


गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या ही पंधराशेच्यावर आहे तर नागपुरातही रुग्णांची संख्या तब्बल 2000 हजारांच्या पार गेली आहे. नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक 10 कोरोना बाधित शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आलाय. 


कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनीही सहकार्य करावं; मुख्यमंत्री आग्रही


राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली तर, राज्यातही काही अंशी सार्वत्रिक लॉकडाऊन नाकारता येत नाही. याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एक आवाहन केलं आहे. 


कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण, मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला  कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शनिवारी त्यांनी हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आवाहन केले. 


मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊनची घोषणा


कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मीरा- भाईंदर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मीरा - भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मीरा- भाईंदर क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ते 31 मार्च मध्यरात्री 12 पर्यंत  हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान मीरा भाईंदर हॉटस्पॉट क्षेत्राबाहेरील सर्व हॉटेल, बार, बँक्वेट हॉल आणि फूड कोर्ट 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत 30 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.शुक्रवारी  मीरा- भाईंदर क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आतापर्यंत मीरा भाईंदर क्षेत्रातील 27, 797 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.  त्यापैकी 26, 199 रुग्ण बरे झाले असून 792 रुग्णांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :