मुंबई : राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली आहे. आज 32 हजार 7 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 16 हजार 348 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.84 टक्के इतके नोंदवले गेले असून आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा निम्म्या संख्येने नवीन रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात 15 हजार 738 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 2 लाख 74 हजार 623 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 59 लाख 12 हजार 258 नमुन्यांपैकी 12 लाख 24 हजार 380 नमुने पॉझिटिव्ह म्हणजे 20.71 टक्के आले आहेत. राज्यात 18 लाख 58 हजार 924 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 517 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 344 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.7 टक्के एवढा आहे.


भारतात सर्वाधिक रुग्ण कोरोमुक्त


देशभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत पोहचलं आहे. बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होऊन, भारतात सलग तिसऱ्या दिवशी 90 हजारपेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 93 हजार 356 रुग्णांना घरी सोडण्यात आले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 43 लाख 96 हजार 399 इतकी होती. जगात रूग्ण बरे होणाऱ्या संख्येच्या बाबतीत भारत उच्च स्थानावर पोहोचला आहे. ही संख्या जगातील एकूण संख्येच्या 19 टक्के एवढी आहे.