नागपूर : लॉकडाऊननंतर भविष्यात टप्प्या टप्प्याने रेल्वे सेवा सुरु करत असताना रेल्वे समोर सर्वात मोठे आवाहन रेल्वे डब्याचे निर्जंतुकीकरणाचे असणार आहे. निर्जंतुकीकरण करत ते प्रवाशांसाठी सुरक्षित देखील असणे तेवढेच गरजेचे असणार आहे. त्यासाठी रेल्वेचे तंत्रज्ञ कामाला लागले आहे


नागपूर मंडळाचे वरिष्ठ अभियंता अखिलेश चौबे यांनी रोबोच्या मदतीने रेल्वे डबे निर्जंतुक करण्यासाठी खास तंत्रज्ञान विकसित केलेआहे. त्याअंतर्गत उस्ताद नावाच्या रेल्वेच्या रोबोधच्या मदतीने प्रत्येक रेल डब्ब्यात अल्ट्रा व्हॉयलेट ब्लास्ट हे यंत्र फिरविले जाते. अल्ट्रा व्हॉयलेट ब्लास्ट हे मुळात अल्ट्रा व्हॉयलेट किरणं उत्सर्जित करणारे यंत्र आहे. या यंत्रातून निघणाऱ्या अतिनील ( अल्ट्रा व्हायलेट ) किरणांचा निळसर प्रकाश रेल्वे डब्ब्यात ज्या ज्या ठिकाणी पसरतो. तो भाग 60 सेकंदात निर्जंतुक होतो. त्यामुळे रेल्वे डब्यातील प्रत्येक आठ आठ बर्थच्या एका कंपार्टमेंटमध्ये 60 सेकंदात हे तंत्र सर्व पृष्ठभाग, विविध हॅण्डल्स, खिडक्या, लाईट आणि पंख्याचे स्विचेस निर्जंतुक करतो. एक रेल्वे डबा पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी अवघे काही मिनिटं लागतात.


Nagpur Railway | नागपुरात रोबोकडून रेल्वेचं निर्जंतुकीकरण, उस्ताद रोबोच्या सहाय्यानं रेल्वेची सफाई



विशेष बाब म्हणजे अतिनील किरणे जास्त वेळ पडल्यास मानवी आरोग्यास हानिकारक असल्याने याचा वापर रोबोच्या मदतीने केला जात आहे. शिवाय अल्ट्रा व्हायलेट ब्लास्ट या यंत्राला घेऊन जाणारा रोबो ज्या रिमोट कंट्रोलने नियंत्रित केला जातो. त्या रिमोट यंत्रणेला एक व्हिडीओ स्क्रीन किंवा मोबाईल जोडल्यावर रोबो आणि अल्ट्रा व्हायलेट ब्लास्ट रेल्वे डब्ब्यात कोणत्या ठिकाणी आहे हे पाहून त्यांचे नियंत्रण करणे शक्य आहे. त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेला नियंत्रित करणारा व्यक्ती त्याच्यापासून बराच लांब राहून निर्जंतुकीकरणाचे काम करू शकतो. विशेष बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने या अल्ट्रा व्हायलेट ब्लास्ट तंत्राने रेल्वे डब्याचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली असून हे लवकरच भारतभर रेल्वे डब्यांमध्ये याचा वापर होण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :