Congress : पहिल्यापासून स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने आता स्पष्टपणे सर्व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसच्या बाजूने स्वबळाची पूर्ण तयारी झाली असून स्थानिक पातळींवर कुठेही आघाडी होणार नाही, असं स्पष्ट करून काँग्रेसने आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आता सेना राष्ट्रवादी अशी तरी अघाडी होते का? हे पहावे लागेल. काँग्रेसचे कांही स्थानिक नेते राष्ट्रवादीने स्वपक्षात घेतल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे.



जाणून घेऊयात, नाना पटोले यांनी पत्रात काय सांगितलं? 


काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस देवानंद पवार यांच्या सहीने असलेल्या या पत्रात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करण्याबाबत सांगितलं आहे.  पत्रात नमूद केल्यानुसार, "आगामी काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणूका होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत, असं म्हटलं आहे. 



पत्रात पुढं म्हटलं आहे की, प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, आपणास कळविण्यात येते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणूका काँग्रेस पक्षाने कुठलीही तडजोड न करता स्वबळावर लढविण्याच्यादृष्टीने आपल्या जिल्ह्यातील जेष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन आढावा घ्यावा. तसेच यासंदर्भात नियोजन करून आपला अहवाल प्रांताध्यक्ष महोदयांच्या अवलोकनार्थ सादर करावा. तसेच आपल्या जिल्ह्यातील गठीत केलेल्या बूथ कमिट्यांची संपूर्ण तपशिलवार अद्यावत माहिती प्रांताध्यक्ष महोदयांच्या अवलोकनार्थ त्वरीत सादर करावी, असं पत्रात म्हटलं आहे.




नाना पटोलेंनी आधीही दिलाय स्वबळाचा नारा



काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधी देखील राज्यातील निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर देखील गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण झाला होता. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं देखील नाना पटोले म्हणाले होते.