नंदुरबार : केंद्र आणि राज्य सरकारचा वाढत्या महागाईविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुव्हा तालुक्यात काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आलं.


अक्राणी धडगाव चे आमदार के.सी पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सातपुड्याच्या दरी-खोऱ्यातून 17 किलोमीटरची पदयात्रा काढत निषेध केला. वाढती महागाई, आदिवासी आणि शेतकरी विरोधी धोरणांचा या पदयात्रेत निषेध केला गेला.

राज्यातील सर्वात दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या अक्राणी तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये अजूनही मुलभूत सुविधा पोचलेल्या नाहीत. त्यातच राज्यसरकार आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी शेतकऱ्यांचा योजना बंद केल्या आहेत.

तसेच देशभरात उडालेल्या महागाईच्या भडक्यात आदिवासी भरडला जात आहे. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी म्हणून आमदार के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.