नागपूर : राज्यातील आज 32 टक्के मराठा समाज अपेक्षा ठेवून आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार निर्णय करणार का ? सरकारची  इच्छाशक्ती आहे का? असा सवाल आज काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.


मराठा आरक्षणाच्या प्रस्तावरच्या विधानसभेत चर्चेवेळी ते बोलत होते. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही निवडून दिलेलं सरकार आम्हाला सुरक्षित ठेवू शकतं का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

'मोर्चे सत्तारुढ पक्षाच्या विरोधात नाहीत, असं आशिष शेलार म्हणाले, मग कोल्हापुरात पालकमंत्री निवेदन स्वीकारणार असल्याचं जाहीर केल्यावर 48 तासात निर्णय का बदलावा लागला, असा प्रश्न विचारत राणेंनी मराठा आरक्षणाबद्दल सरकारने विचार करायला हवं, असं ठणकावलं.

आमदार आशिष शेलार यांचं भाषण ऐकताना राजकारणाचा वास येऊ लागल्याचं सांगत राजकारणाचा किती तो वास, आमची चूक नाही असं कधीपर्यंत बोलणार? शेलार जागा आणि वेळ ठरवावी, राज्य सरकारचे अॅफिडीव्हीट आणि राणे समिती अहवाल बसून चर्चा करु असं आव्हान नितेश राणे यांनी अशिष शेलार यांना दिले.

राणे समितीच्या सगळ्या शिफारशी स्वीकारल्या तर मग राणे समितीवर का बोट ठेवता असा सवाल विचारत अशिष शेलार यांना नितेश राणे यांनी धारेवर धरलं.

राज्य सरकारने कोर्टात केस नाजूक करण्यासाठी शाहू फी परिपुर्ती योजनेचा निर्णय घेतल्याची टीका राणे यांनी केली. या सरकारने पीएसआय परीक्षेत वय वाढवल्याचे जाहीर केले, पण वयोमर्यादा अजून वाढवली नाही. त्यामुळे हे सरकार मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.