Hiraman Khoskar Meets CM Eknath Shinde : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला. तीनपैकी दोन उमेदवारांचा विजय झाला तर एका उमेदवाराचा पराभव झाला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्याचं चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारवाईची टांगती तलवार असतानाच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील आनंदाश्रमात पोहोचले. 


भेटीनंतर काय म्हणाले हिरामण खोसकर?


ही भेट अतिक्रमण संदर्भातील होती, असे हिरामण खोसकर यांनी म्हटलं असलं, तरी गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गट किंवा अजित पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत, असं विधान केलं होतं. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसने ज्या आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये खोसकर यांचाही समावेश आहे का? अशीही चर्चा आहे. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहीर नाराजी


दरम्यान, तीन दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त केली होती. विधान परिषद निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींनी सांगितले त्यांनाच मतदान केले. माझ्यासह 7 आमदारांना मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीचे  मतदान करण्यासाठी सांगितले होते आम्ही केले. जयंत पाटील यांना ज्या 6 आमदारांनी मतदान केले त्यांचे मतं फुटले, त्यावर पक्षश्रेष्ठी का बोलत नाही, त्या 6 जणांवर कारवाई का करत नाही? अशी विचारणा त्यांनी केली. 


अन्यथा माझी बदनामी थांबवा


ते पुढे म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांना 23 मत पडणार होती, त्यातील एक मत फुटलं आहे. नाना पटोले, के सी पाडवी यांच्यासह 7 जणांनी मिलिंद नार्वेकर याना मतदान केले. मी मराठीत मतदान केले, माझ्यावर संशय आहे तर माझी मतपत्रिका कोर्टाच्या ऑर्डर घेऊन चेक करावी, त्यांना लगेच कळेल, आम्ही 2 जणांनी मराठीत मतदान केले आहे, त्यामुळे मतपत्रिका सापडेल. मी दोषी असेल तर माझी पक्षातून हकालपट्टी करा, अन्यथा माझी बदनामी थांबवा. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांना माहिती आहे ते 6 जण कोण आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या