मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांना कमजोर करण्यासाठी सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सत्य सांगणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.  


पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने काल रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर आज कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करत केंद्राकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. राहुल गांधी यांनी देखील संजय राऊत यांना ईडी कार्यालयाकडे घेऊन जात असल्याचा फोटो ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 


"राजा'चा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्याविरुद्ध बोलेल त्याला त्रास होईल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचे मनोधैर्य खचविण्याचे आणि सत्य  दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण 
 तानाशाह ऐक, शेवटी सत्याचाच विजय होतो आणि अहंकार हरतो." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 






 संजय राऊत यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस संजय राऊत यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत असणार आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या अकटे नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.