भंडारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय संस्थांकडून होणाऱ्या कारवाईवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. भाजपकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सूडाने कारवाई केली जात आहे. भाजप विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजपमध्ये काय सर्व दुधाने धुतलेली लोकं आहेत? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.  


अनिल देशमुख प्रकरणात ईडीने सर्व सर्व विमानतळ प्राधिकरण यांना अनिल देशमुख यांच्या बाबत नोटिसा बजावल्या आहेत. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मात्र जे लोक भाजप विरोधात बोलत आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जात आहे. मात्र भाजपात काय दुधाने धुतलेली लोक आहेत? त्यांच्यावर काय भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत का? त्यांच्याकडे भ्रष्ट मालमत्ता नाही का? याची माहिती ईडी, सीबीआयकडे नाही का? असे प्रश्न सामान्य लोक विचारु लागले आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 


भाजपवर टीका करताना नाना पटोले यांनी म्हटलं की, राज कुंद्रा यांनी जे व्हिडीओ बनवले आहेत ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. जर उद्या राज कुंद्रा भाजपात गेले तर ते व्हिडीओ रामायणाचे आहेत असं भाजप म्हणणार आहे काय? कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. भाजपचा विरोध केला म्हणून जर या स्वायत्त संस्थांचा कुणी गैरवापर करत असेल तर हे चुकीचे आहे.


भाजपच्या धोरणाविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर हे चुकीचे आहे. ईडी आणि सीबीआय स्वायत्त संस्था आहे, त्यांच्याकडून अशा कारवाईची अपेक्षा नाही. त्यांनी सर्वांवर एक समान कारवाई करावी. ज्यांनी चुकीची कामं केली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं. 


देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक - नाना पटोले


जावेद अख्तर यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली याबद्दल नाना पटोले म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यामुळेच जर आरएसएस देशाविकला जात असताना सुद्धा काही बोलत नाही. शेतकरी यांच्यावर लाठीमार होत असेल अशा प्रश्नांवर काही बोलत नाही. म्हणजेच या गोष्टींचे समर्थन जर आरएसएस करत असेल आणि त्या प्रश्नावर जर जावेद अख्तर काही बोलत असतील तर त्यात काही वेगळं नाही. कारण देशापेक्षा एखादी संघटना मोठी नाही आणि जर एखादी संघटना असं समजत असेल तर हे देशाला हानिकारक आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.