जालना : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.   "अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करुन राज ठाकरेंनी संविधान मान्य नसल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत" असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला आहे.   त्यामुळेच राज ठाकरेंवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिपने केला आहे. तशी तक्रार भारिपने तालुका पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.   "राज ठाकरे हे लोकशाहीविरोधी असून, त्यांना संविधान मान्य नसल्याचं दिसतंय. त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा" असं भारिपने तक्रारीत म्हटलं आहे.   काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे यांनी काल कोपर्डीतील बलात्कार पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरीयतसारखा कायदा देशात लागू करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. तसंच जर अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याला पर्याय शोधला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

संबंधित बातम्या

बलात्काऱ्यांचे हातपाय तोडा, राज ठाकरे कोपर्डीत

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, राज ठाकरेंची मागणी