वर्ध्यात कॉलेज युवकांच्या भांडणात एकाची भरदिवसा भोसकून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 15 Dec 2017 12:25 PM (IST)
वर्ध्यात कॉलेज युवकांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वर्धा : वर्ध्यात कॉलेज युवकांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (शुक्रवार) सकाळी वर्ध्याच्या म्हाडा कॉलनी चौकात ही घटना घडली आहे. समीर मेटांगळे असं मृत तरुणाचं नाव आहे. समीर मेटांगळे आणि त्याच्या मित्रांचा कॉलेजमधील इतर युवकांशी वाद झाला होता. मात्र, तो सामोपचारानं मिटवण्यासाठी आज सकाळी 10 वाजता भेटायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे समीर आपल्या मित्रांसोबत म्हाडा कॉलनी परिसरात आला. मात्र, शाब्दिक वाद वाढत गेला आणि त्यातूनच समीरला एकानं चाकूने भोसकलं.यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं समीरचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इतर दोघेजणही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.