Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. दिवसभर ऑक्टोबर हिटची झलक आणि संध्याकाळी काहीशी बोचरी थंडी असा प्रकार पावसाने उघडीप घेतल्यानंतर दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसराह जिल्ह्यात पारा घसरला आहे. रात्रीचा पारा 18 अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने बोचरी थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. दिवसभरच्या वातावरणात उन्हाचे चटके आणि गारठा असे दोन्ही प्रकार दिसून येत आहेत. आगामी आठवडाभर तापमानात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.


परतीच्या पावसाचा जिल्ह्यात कहर 


दुसरीकडे परतीच्या पावसाने निरोप घेतला असला, तरी पिकांची मात्र जिल्ह्यात चांगलीच नासाडी झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन आणि भाजीपाल्याला बसला आहे. या संदर्भात प्रत्येकांच्या पंचनामाचा अंतिम अहवाल लवकरच येईल त्यानंतर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनीती दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. 


पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पंचनाम्यामध्ये 3107 हेक्टर क्षेत्रांमधील पिकाचे नुकसान झाले आहे, अजूनही पंचनामे सुरू आहेत. पंचनामा झाल्यावर हा अहवाल शासनाकडे पाठवून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. 


जिल्ह्यातील 944 हेक्टरवरील भाजीपाला, 871 हेक्टर सोयाबीन, 54.30 हेक्टर भात, 858 हेक्टर भुईमूग, 80 हेक्टरवरील विविध फुले, 275 हेक्‍टर इतर पिके व 25 हेक्टरवरील फळांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 2313 हेक्टरवरील नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यात 933, शाहूवाडी 49 हेक्टर, करवीर तालुक्यात 8.10 तर भुदरगड मधील 4 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या