पंढरपूर : राज्यात चांगला पाऊस पडू दे, आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी काम करण्याची शक्ती दे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाचरणी मागितलं आहे. आषाढीनिमित्त पंढरपुरात विठूरायाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली. या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विठूरायाचरणी केलेल्या साकड्याची माहिती दिली.


शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याऐवजी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी काम करण्याची शक्ती दे असं मागणंही मुख्यमंत्र्यांनी विठूरायाचरणी केलं आहे. शेतकऱी कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेलं साकडं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरही शेअर केलं आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/882014956748591104

राज्यात चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांना चांगलं पीक येऊ दे, असं साकडंही मुख्यमंत्र्यांनी मागितलं आहे. शेतकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुनही याची माहिती दिली आहे, तसंच महापूजेवेळचे फोटोही शेअर केले आहेत.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/882012701303521280

तसंच वारकऱ्यांना मंदिर समितीमध्ये स्थान देण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

शासकीय महापूजनेंतर झालेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागेला आणि विठूरायाच्या पंढरीला निर्मल करण्याचं आश्वासन दिलं.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात पांडुरंगाच्या भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन महापूजा केली. विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मंदिरात जाऊन रुक्मिणी मातेची मुख्यमंत्र्यांनी महापूजा केली. पंढरीत विठूरायाच्या दर्शनासाठी अलोट जनसागर लोटला आहे.

आषाढीनिमित्त पंढरीत भक्तीचा सोहळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची महापूजा