मुंबई : संपूर्ण देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. आपण त्यामुळं सीबीआयला वेसण घातली. दुरुपयोग व्हायला लागल्यावर अशी वेसण घालावीच लागते. ईडी, सीबीआय वर राज्याचा अधिकार नाही का? आम्ही नावं देतो, आमच्याकडे नावं आहेत. मालमसाला तयार आहे. पण सुडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. (CM Uddhav Thackeray Saamana Interview with Sanjay Raut) या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.


आडवे येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल


यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,  मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक चमत्कार महाराष्ट्राच्या मातीत आहे, तेज आहे. जेव्हा संकटं आली, आपत्त्या आल्या, भलेभले अंगावर आले पण काय झाले? असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल, कुणी डिवचेल तर काय होतं याचे दाखले इतिहासात आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. अशी संकटं अंगावर घेऊन ती पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढं जात राहिला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही. कुणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.


'मी शांत, संयमी... याचा अर्थ नामर्द नाही, अंगावर येणाऱ्यांची खिचडी शिजवू', उद्धव ठाकरेंचा इशारा


 तुमच्याकडं सूडचक्र आहे तर आमच्याकडं सुदर्शनचक्र


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीत तर तुम्ही आम्हाला हिंदुत्ववादी म्हणता ना मग ठीक आहे. तुमच्याकडं सूडचक्र आहे तर आमच्याकडं सुदर्शनचक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. सूडाने वागायचं आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे, हे असं विकृत बुद्धीचे चाळे करु नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका. राजकारण राजकारणासारखं करा. तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करुन अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कुणाकडे राहात नसते. जनता ही मोठी ताकद आहे आणि खरी सत्ता ती असते. ती आमच्यासोबत आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो


ईडी वगैरेचा गैरवापर करुन दबाव आणत असाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो तुम्हालाही कुटुंबं आहेत. मुलंबाळं आहेत हे विसरु नका. पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरु झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.


तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही नावं देतो, आमच्याकडे नावं आहेत. मालमसाला तयार आहे. पण सुडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.