मुंबई : राज्यात कोरोना निर्बंध उठवल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. यासंदर्भात काल (बुधवारी) मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, राजकीय रॅली आणि सभा घेताना काळजी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवारी) मंत्रीमंडळ बैठकीत केलं आहे. तसेच मॉल संदर्भातही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. येत्या दोन दिवसांमध्ये टास्कफोर्सची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र मॉलमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, अशीही चर्चा करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं लस देण्यात यावी, अशीही चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. त्यामुळे आतामॉल सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राज्यभरात कोविडची परिस्थिती काय? याचाही आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला 


17 ऑगस्ट 2021 पर्यंतची राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या :


एकूण बाधित रुग्ण : 64 लाख 1 हजार 213
कोरोनामुक्त रुग्ण : 62 लाख 1 हजार 168
एकूण मृत्यू : 1 लाख 35 हजार 255
सक्रिय रुग्णसंख्या : 61 हजार 306
रुग्ण बरे होण्याचा दर : 96.87 टक्के 


जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती?


शून्य रुग्ण : बुधवारी नंदूरबार जिल्ह्यात एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.
दहापेक्षा कमी रुग्ण : राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी
शंभरपेक्षा कमी रुग्ण : राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या 100 पेक्षा कमी


सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग
राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) 2.44 टक्के इतका आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत कोल्हापूर, रत्नागिरी या शहरांतील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापी, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे, या जिल्हयांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर 2.44 टक्क्या पेक्षाही कमी आलेला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना राज्य सरकारचा दिलासा, जिल्हा सहकारी बँकांतून 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा