मुंबई : मजुरांच्या स्थलांतराबाबत इतर राज्यांशी चर्चा सुरू आहे. मजुरांनी कुठेही जाऊ नये. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. या घटनेने मी व्यथित झालो, त्यामुळे मजुरांनी संयम राखावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


उद्धव ठाकरे म्हणाले, मजुरांनी गर्दी करु नये, संयम राखावा अन्यथा सर्व ठप्प होईल. अस्वस्थ होऊ नका. केंद्राशी समन्वय साधून स्थलांतर करण्याच प्रयत्न सुरु आहे. इतर राज्यातल्या सुमारे सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे.

अफवेला बळी पडू नका. मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. त्यामुळे मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही केसेस सापडत आहेत, तिथे शिथिलता इतक्यात शक्य नाही. लॉकडाऊन हा गतीरोधक आहे, पण चेन तोडायला अद्याप यश नाही.लॉकडाऊन किती वेळा वाढवायचा? आपल्याला चेन तोडण्यात यश आलेलं नाही, ते यश मिळवायचं आहे. पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून अधिकच्या मनुष्यबळाची मागणी करणार, नंतर पुन्हा टप्प्या टप्प्याने पोलिसांना तैनात करू, याचा अर्थ लष्कर बोलावलं असा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतील टेस्ट सुरुच राहतील, राज्यात सर्वाधिक टेस्ट होत आहेत, शेवटच्या टप्प्यात रुग्ण आल्यावर उपाय कमी पडतात.कोरोनाची साखळी तोडण्याची वेळ आहे, अनेक रुग्ण उशिराने समोर येत आहेत, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील तर स्वतःहून पुढे येऊन तपासणी करा, घाबरु नका.राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेत, पण बरे होणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे, सव्वातीन हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले.

उद्धव ठाकरे  यांनी डॉक्टरांनी देखील आवाहन केले. 'आयुष डॉक्टरांनाही मदतीसाठी पुढे यावं, तुम्हा सर्वांची महाराष्ट्राला गरज आहे. आयुर्वेदीक डॉक्टरांनीही सहभागी व्हावं.लॉकडाऊन वाढवण्यात कुणाला रस नाही, पण प्रत्येकाने शिस्त राखणं आवश्यक आहे, माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे.आपल्याला सामाजिक अंतर ठेवायचं नाही, तर शारिरीक अंतर ठेवायचं आहे, म्हणूनच मी फिजीकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला'.