शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मुंबई-नागपूर हायवे प्रकल्प पूर्ण करु: मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 08:04 PM (IST)
शहापूर: शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनचं मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकल्प पूर्ण केला जाईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आसनगावमध्ये सुरू असलेल्या कुणबी महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते. समृद्धी कॉरिडॉरलगतच्या जमीन अधिग्रहणावरून सरकारवर टीका केली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हे आश्वासन दिलं आहे. दरम्यान, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार असून फक्त प्रशासकीय निर्णय बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शहापूर आणि लगतच्या गावातील पाणी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 200 कोटींची योजना जाहीर केली आहे. तसंच ज्या गावात धरण त्या गावाला पाणी या तत्वावर कायदा करण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.