विधानसभा बरखास्त होणार नाही, चव्हाणांच्या भाकितावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2019 12:06 PM (IST)
28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही घेतली जाईल. त्यामुळे कामाला लागा," असं अशोक चव्हाण म्हणाले होते
मुंबई/औरंगाबाद : विधीमंडळ अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करुन लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घेतील, असं भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. तसंच कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. औरंगाबादमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) झालेल्या एका सभेत ते बोलत होते. दरम्यान, अशोक चव्हाण यांचं भाकित मुख्यमंत्र्यांनी फेटाळलं आहे. "अशोक चव्हाण यांचं विधान चुकीचं, राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही. पायाखालची जमीन सरकल्याने चव्हाण यांनी मत मांडलं असावं, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा केल्यानंतर आता काँग्रेस राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहे. अशोक चव्हाण यांनी औरंगाबादच्या खुलताबादेमधून याची सुरुवात केली. त्यावेळी चव्हाण यांनी आगामी निवडणुकीबाबत एक भाकित केलं. "28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही घेतली जाईल. त्यामुळे कामाला लागा," असं अशोक चव्हाण म्हणाले होते.