मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आतापर्यंत अनेकदा आपले सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत गंभीर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. पण त्यांच्या एका व्हिडीओमुळे त्यांच्याच दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडीओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे असे म्हणताना दिसून येत आहेत. त्यांचा यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. आता मुखमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ प्रकरणी या तिन्ही नेत्यांना ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे, असे म्हणताना दिसून येत आहेत.


मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्यात नेमका कोणता संवाद झाला.



  • मुख्यमंत्री शिंदे -आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

  • अजित पवार – हो……येस

  • देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे 


विरोधकांची टीका 


दरम्यान या व्हिडीओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांची मराठा आरक्षण प्रश्नाबाबतची अनास्था दर्शवत असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले , मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद सोशल मीडीयावरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.






संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवणे चुकीचे : मुख्यमंत्री


मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे.


हे ही वाचा :