मुंबई : ‘अहमदनगरमधील शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्या प्रकरणात हात असलेल्या आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी करावी.’ अशी मागणी शिवसेनेनं केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे कर्डिलेंच्या हकालपट्टीवरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा तलवार म्यान करावी लागली आहे.


दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी भाजपला पुन्हा लक्ष्य केलं. ‘भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. पण त्यांच्या हकालपट्टीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळलं. मात्र, दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.’ असं रामदास कदम यावेळी म्हणाले.

आमदार शिवाजी कर्डीले यांची भाजपातून हकालपट्टी होणार नाही, मात्र शिवसैनिकांवर दाखल झाले गुन्हे मागे घेऊ. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांची बोळवण केल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले.

या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं होतं.

संबंधित बातम्या

शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत

नगरमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या

शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी

नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला

भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून संगनमताने हत्या : रामदास कदम