पुणे: एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून, आपले आंबे सडवू नका, अशी खोचक टीका पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.  ते मावळमध्ये बोलत होते.


मावळ तालुक्यातील कार्ला येथील अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना बापट यांनी राष्ट्रवादीवर खोचक टीका केली.

दुसरीकडे शिवसेना हा भाजपचा मित्र पक्ष असल्याने, त्यांचे कार्यकर्ते भाजपात आले तर येऊ द्या, असं म्हणत शिवसेनेचे कार्यकर्ते फोडा असा अप्रत्यक्ष सल्लाच बापट यांनी दिला.

गिरीश बापट काय म्हणाले?

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचं स्वागत करतो. अजून कोणी राहिलं असेल, तर त्यांनाही घेऊन या. फक्त राष्ट्रवादीचं कोणी आणू नका. तसंही राष्ट्रवादीत कोणी राहिलं नाही, पळापळ झालीय. पण शिवसेनेतून आपल्या पक्षात येऊ द्या. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे, आपल्याला काही अडचण नाही.

राष्ट्रवादीतील कोणी का नको, याचं कारण म्हणजे एखादा आंबा जरी सडका-किडका असला, तर मला भीती वाटते की आमचेच सगळे आंबे सडायचे. त्यामुळे त्यांना जे काय करायचंय ते करु द्या.

‘हल्लाबोल’सारख्या कार्यक्रमांनी महाराष्ट्रातील जनता फसणार नाही. जनतेला कोण काम करतंय हे माहिताय, असं गिरीश बापट म्हणाले.